सातारा -राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजपचा हात असून केंद्राच्या मदतीने शिवसेनेत फूट पाडण्यात आली आहे. त्यामुळे कोणी जनतेला गृहित धरु नये. आकड्यांच्या गणितावर सगळा खेळ असून सत्ता कोणी गृहित धरु नये, असा टोला माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यास शिबिर शिर्डी येथे होणार असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब पाटील बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसला निदान 15 ते 20 वर्षे सत्ता मिळणार नाही असे वक्तव्य पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले होते. याबाबत बाळासाहेब पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, “लोकशाहीत कधीच कोणी कोणाला गृहित धरु नये. राज्यातील सरकारबद्दल प्रचंड असंतोष असून ज्या पध्दतीने हे सरकार स्थापन झाले आहे त्याची चीड लोकांमध्ये आहे. जनतेला गृहित धरुन सत्ता आमचीच राहील असे म्हणणे चुकीचे होणार आहे. सत्ता येते आणि जाते. मात्र, सत्तेचा हव्यास चांगला नाही.’ सत्ता कोणी गृहित धरुन राहू नये,’ असा टोलाही बाळासाहेब पाटील यांनी शंभूराज देसाई यांनी लगावला.
शिंदे गट आणि भाजपच्या सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन वादंग सुरु आहे. 20 मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रिमंडळात जात नाहीत. विकासकामांऐवजी अडवआडवी, जिरवाजिरवीकडे या सरकारचे लक्ष आहे. यंत्रणांचा गैरवापर करुन चौकशीचा ससेमिरा मागे लावून यांचा कारभार जास्त काळ टिकणार नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असताना हे सरकार याप्रश्नी गांभिर्याने निर्णय घेत नाही. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतही सरकारने लक्ष घातले नाही.
शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत मिळावी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवून तशी मागणी केली आहे. मात्र, शेतकऱ्याच्या हितासाठी सरकार निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील मंत्री काहीही बोलत असल्याने त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड राग आहे. सरकारने वेळीच सावध होवून शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी बाळासाहेब पाटील यांनी केली.
शिधा योजनेबाबतची
भाषा चुकीची
दिवाळीत शंभर रुपयात शिधा देण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला. याबाबत यंत्रणा म्हणावी तशी राबली नाही. परिणामी अनेकांना दिवाळीचा शिधाच मिळाला नाही. काही ठिकाणी शिध्यातील वस्तू गायब होत्या. सरकारने घाईगडबडीत निर्णय घेतला असताना सरकारमधील मंत्री तुळशी विवाहापर्यंत शिधा पोहोचेल अशी भाषा वापरत आहेत, ही बाब निश्चितच चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.
=========================