प्रस्तावित गावांना फायदा ः 8 कि. मी. चे अंतर दोन किलोमीटरवर
मलठण – दौंड तालुक्यातील पूर्व भागात अष्टविनायक महामार्गामुळे दळणवळणाबरोबर सर्वच बाबतीत या परिसराचा विकास होत आहे. याचाच एक भाग म्हणून खडकी ते सिद्धटेक या रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. यामुळे प्रस्तावित रस्त्यावर येणाऱ्या लोणारवाडी, काळेवाडी, ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी, शिरापूर या गावांना फायदा होणार आहे.
सद्यःस्थितीत हिंगणीबेर्डी ग्रुप ग्रामपंचायतमधील काळेवाडी व ज्योतिबानगरमधील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी बोरीबेल-देऊळगावराजे रस्त्यावरून सुमारे आठ किलोमीटर अंतर पार करावे लागत होते; परंतु आता या नवीन होणाऱ्या मार्गामुळे हे अंतर केवळ दोन किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे.
या रस्ते विकासाच्या अनुषंगाने अनेक गावे रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल प्रयत्नशील असतात. या मार्गावरील हिंगणीबेर्डी, लोणारवाडी, ज्योतिबानगर या गावांना अद्यापपर्यंत एसटी बस किंवा इतर खासगी वाहन प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आणि दळणवळणासाठी कोणत्याच प्रकारची सोय नव्हती. नवीन होणाऱ्या या रस्त्यामुळे शेतकरी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात याचा खूप मोठा फायदा होणार आहे. दौंड तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावांतील रस्त्यांची बिकट अवस्था होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दुतर्फा काटेरी झुडपे गर्दी यामुळे सर्वसामान्यांना प्रवासासाठी कसरत करावी लागत होती.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे या भागातील वंचित, प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लागले आहेत. संपूर्ण मार्ग दुहेरीकरणाससह प्रत्येक गावठाण हद्दीत कॉंक्रेट रस्त्याचे नियोजन आहे. लोणारवाडी, काळेवाडी, चौफुला, ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी, शिरापूर या संपूर्ण परिसराला दळणवळणाबरोबर विकासाला गती मिळणार आहे.
– गणेश गायकवाड, माजी सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी, काळेवाडी
वाहतूक सोयीस्कर, जलद होणार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी ते सिद्धटेक मार्गामुळे सोलापूर, बारामती, सातारा, फलटणकडून होणाऱ्या वाहतुकीचे अंतर सुमारे 25 किलोमीटरने कमी होणार आहे. यापूर्वी दौंड शहरातून मार्ग होता, यामुळे काही वेळा शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी होत होती; परंतु या नवीन प्रस्तावित मार्गामुळे प्रवासाचे अंतर व वेळ वाचणार आहे.
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून दुरुस्ती
काळेवाडी, चौफुला ते खडकी या रस्त्यावर सध्या खड्डे पडल्याने आणि पावसाचे पाणी साचल्याने या भागात किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी या भागातील ग्रामस्थांची होती. आमदार राहुल कुल यांनी या प्रश्नाबाबत लक्ष घालून विशेष दुरुस्तीअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच हा रस्ता पक्क्या स्वरूपाचा होऊन डांबरीकरण होणार आहे.