जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अचानक नेमली पथके
नगर – दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातील पालकमंत्र्याच्या मतदार संघातील कर्जत तालुक्यात 73 चारा छावण्या सुरु आहेत. या छावण्यामध्ये जनावरांना नियमित चारा मिळतो का? याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या 36 पथकांनी अचानक तपासणी केली. कारवाईचा तपशील मात्र कळू शकला नाही. याकारवाईमुळे पालकमत्र्यांच्या मतदार संघातच महसूलने कारवाईचा बडागा उगारला असल्याची चर्चा सुरु आहे.
दुष्काळी भागात पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण मार्च अखेर 504 चारा छावण्या सुरु होत्या. आता मात्र जिल्हात 257 चारा छावण्या सुरु असून 1 लाख 35 हजार 263 जनावरे आहेत.
कर्जत तालुक्यात 73 चारा छावण्या मध्ये लहान जनावरे 3 हजार 485 तर मोठी 37 हजार 326 जनावरे आहेत. अशी एकूण 40 हजार 811 जनावरे आहेत. या जनावरांना छावणी मध्ये पशुधनाला दिले जाणाऱ्या पाण्याचे नमुणे तपासणी केली जाते का? दाखल जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत नियमित पणे तपासणी होती का? व आवश्यक ते औषधोपचार केले जाते का, जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही, नकाशा प्रमाणे छावणीची रचना केली आहे काय?
आजारी जनावरांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे का? छावणी मालकाने स्वतंत्र विद्युत मिटर घेतले आहे का? प्रत्येक जनावरांची व चारा वाटप ठिकांनचा व्हिडिओ चित्रीकरण होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे का? छावणी परिसरात धूम्रपाण होत असल्याचे आढळूण आले आहे का तसेच जनावरांना पशुखाद्य दिले जाते का? शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे चारा वाटप केली जाते का? याबाबत तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अचानक ही पथके नेमल्याने संबंधित अधिकारीही अनभिज्ञ असल्याचे समजते.
यापूर्वीही केली होती अचानक छावण्यांची तपासणी
यापूर्वीही जिल्हाधिकारी यांनी 21 पथकांची नियुक्ती करण्या आली होती. त्यामध्ये 7 प्रांताधिकारी व 14 तहसीलदारांचा समावेश होता. त्यानुसार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा अथवा चारा छावण्यामध्ये अनियमितता आढळल्यास त्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना सादरण्याबाबत आदेश देण्यात आले. मात्र याबाबात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे.
जनावरांना दिला जातो कमी चारा; मात्र कारवाई काय होणार
शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे मोठ्या जनावरांना 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा देणे बंधन कार आहे. किंवा वाळलेला चारा 5 ते 6 किलो किंवा मुरघास मोठ्या जनावरांना 8 किलो तर लहान जनावरांना 4 किलो देणे बंधन कारक आहे. परंतु अनेक छावण्यामध्ये मोठ्या जनावरांना 15 किलो तर लहाण जनावरांना 7.5 किलो चारा वाटप करण्यात येत आहे. मात्र कारवाई काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.