कोपरगाव -कोपरगाव तालुक्याला येवल, मालेगाव, औरंगाबाद, नाशिक येथून येणाऱ्यांमुळे करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन तालुक्याच्या सीमा भागात पोलीस पथके व गावपातळीवर स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेषतः मालेगाव-येवला येथून कोपरगाव तालुक्यात कोणीही सहजासहजी येणार नाही, याची दक्षता महसूल व पोलीस प्रशासन घेत आहे. संपूर्ण तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. याबाबत दैनिक प्रभातने शेजारच्या तालुक्यांतून कोपरगावमध्ये डोकावयोत संसर्ग, या शीर्षकाने बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत खबरदारीची उपाययोजना सुरू केली आहे.
तहसीलदार चंद्रे म्हणाले, सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली अनेक वाहनांतून मालाची वाहतूक केली जात आहे. त्याचा गैरफायदा घेवून छुप्या पध्दतीने प्रवासी वाहतूक होत आहे. विशेषतः मालेगावचे नागरिक येवल्यात येतात. तसेच येवल्याचे नागरिक कोपरगावात विविध व्यवसाय व फळे, पालेभाज्या खरेदी-विक्रीसाठी ये-जा करीत असतात. या माध्यमातून कोपरगाव तालुक्याला करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.
इतर शहरांतून दररोज 50 ते 60 नागरिक छुप्या पद्धतीने येत असल्याचे तपासाअंती उघड होत आहे. त्यामुळे सध्या कोपरगाव तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नसला, तरी शेजारच्या तालुक्यांतून संसर्ग होऊ शकतो. तेव्हा या बाधित भागातील नागरिकांचा संपर्क टाळण्यासाठी मालेगाव, येवला, औरंगाबाद येथील नागरिक, नातेवाईक, व्यावसायिकांशी येथील नागरिकांनी सध्यातरी संपर्क करू नये, असे आवाहान केले आहे. जर कोणी सीमा भागातून विनाकारण ये-जा करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी जागोजागी चेकपोस्ट लावले असून, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी शहरासह तालुक्यात रात्रीची गस्त वाढवली आहे. सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी साध्या वेशात आपल्या पथकासह रस्त्यावर उभे राहून विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. तर अनेकांवर गुन्हा दाखल करून पोलिसी खाक्या दाखवला. शहरात रात्री वाहने घेऊन फिरणाऱ्यांना मानगावकर यांनी चांगलेच वठणीवर आणले.
मुख्य रोड, इंदिरापथ, निवारा रोड, सुभद्रनगर परिसरातील अनेकांना मानगावकर यांनी प्रसाद दिला. त्याची चांगलीच चर्चा सुरू होती. नागरिकांनी बाहेर न पडता घरात बसावे व परिवाराला करोनाबासून दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बाहेर पडलाच तर तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा. विना मास्क आढळल्यास कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पालिकेने पथकेही नियुक्त केले प्रशासनाकडून सांगण्यात आले.