नवी दिल्ली: देशातील 15 राज्यांच्या 25 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात एकही करोना संक्रमित रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, आज देशातील कोरोनाग्रांच्या संख्येने 10 हजारांचा टप्पा पार केला आहे, तर आतापर्यंत भारतामध्ये कोरोनामुळे 339 जणांचा मृत्यू झाला आहे.
गोंदिया (महाराष्ट्र), द्रुग, बिलासपूर, राजनांदगाव (छत्तीसगड), देवनागिरी, उडुपी, तुमकुरू आणि कोडगू (कर्नाटक), वायनाड, कोट्टायम (केरळ), पश्चिम इम्फाल (मणिपूर), दक्षिण गोवा (गोवा), राजौरी (जम्मू काश्मीर), आयजोल पश्चिम (मिझोराम), माहे (पुडुचेरी), एसबीएस नगर (पंजाब), पाटणा, नालंदा, मुंगेर (बिहार), प्रतापगड (राजस्थान), पानिपत, रोहतक, सिरसा (हरयाणा), पौढी गढवाल (उत्तराखंड) आणि भद्रादी कोट्टागुडम् (तेलंगणा) या 25 शहरात कोरोनाचा एकही नवा संक्रमित रुग्ण गेल्या दिवसात आढळला नसल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात हालचाली नियंत्रित करण्यासाठी 50 हजार एनसीसी कॅडेट्सची मदत घेण्यात आली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आर्थिक दुर्बल वर्गातील 30 कोटी लोकांना आतापर्यत28 हजार 256 कोटी रुपये देण्यात आले असून जनधन योजनेतील महिलांच्या खात्यात 9903 कोटी रुपये, तर शेतकऱ्यांच्या खात्यात 13 हजार 855 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
दोन लाखावर लोकांच्या चाचण्या आजपर्यंत 2 लाख 27 हजार लोकांच्या कोरोनाविषयक चाचण्या करण्यात आल्या असून सरकारी प्रयोगशाळेसह 1913 खासगी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या सुरू असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने सांगितले आहे. सहा आठवडेपर्यंत आपण तपासण्या करू शकू, एवढ्या टेस्टिंग किट्स आपल्याजवळ आहेत. चीनमधून 15 एप्रिलपर्यंत टेस्टिंग किट्सचा पहिला लॉट भारतात पोहोचणार असल्याचे कौन्सिलने कळवले आहे.