नवी दिल्ली : लॉकडाऊन दरम्यान नागरिक त्रस्त असतानाच केंद्रसरकाने दिलासादायक बातमी दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत दरमहा ५ किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे. भारतातील ८० कोटी लोकांना गहू आणि तांदळाचे मोफत वाटप करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली.
याबाबतची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली असून गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचेही सांगण्यात आले आहे. आतापर्यंत भारतामध्ये कोरोनामुळे ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची लागण झालेले १०३५ रुग्ण आता ठणठणीत झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती देखील वार्तालापातून देण्यात आली. देशामध्ये आतापर्यंत १०३६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील १०३५ रुग्ण बरे झाले आहेत तर ३३९ रुग्ण दगावले आहेत. सध्याच्या घडीला देशामध्ये कोरोनाच्या८९८८ ऍक्टिव्ह केसेस आहेत.
तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉक डाउनच कालावधी ३ मेपर्यंत घेतला असून कोरोनाविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.