रविवारच्या सुट्टीदिवशीही पालिका कर्मचारी ऑन ड्युटी
* पालिकेचे 35 कर्मचारी राबले
* दोनशे टन गोळा झाला कचरा
* शहरातील रस्त्यांची भव्यता वाढली
* स्वच्छ-सुंदर कराडची संकल्पना सत्यात
कराड (प्रतिनिधी) -गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात गाजत असलेला विषय म्हणजे कराड नगर पालिकेने पोलिसांच्या सहकार्याने शहरात राबविलेली अतिक्रमण मोहीम. या मोहिमेने सर्वांनाच हादरवून सोडले. शहरातील संपूर्ण अडगळ निघून रस्ते मोकळे झाले. मात्र, त्यांचे साहित्य तसेच रस्त्यावर पडून होते. या चारही दिवसांत पालिकेची स्वच्छता मोहीम पूर्णपणे ठप्प होती. त्याला रविवारी सुट्टीच्या दिवशी पुन्हा प्रारंभ करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी सुट्टीदिवशीही हजेरी लावत रस्त्यांवर पडलेले अतिक्रमणांचे साहित्य उचलत स्वच्छता केली. संपूर्ण दिवसभरात सुमारे दोनशे टनहून अधिक कचरा गोळा करण्यात आला.
गेले चार दिवस कराड नगरपालिकने अतिक्रमण मोहिमेचा धडाका लावला आहे. त्याचा शहरातील व्यापाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. काहींनी स्वत: पुढाकार घेत आपली अतिक्रमणे काढली. ही मोहीम तोंडे बघून होत असल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी संघटनेने बंद पाळत मूकमोर्चाही काढला. परंतु, पालिका व पोलीस प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरातील अतिक्रमणे काढण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळे अजून काही दिवस ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमीत करण्यात आलेल फलक, मोठमोठे होर्डींग्ज, टपऱ्या, हातगाडाधारक, दुकानांच्या फरशा उद्ध्वस्त केल्या आहेत. सुमारे एक हजाराच्या आसपास अतिक्रमणे गेल्या चार दिवसात काढण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे काढत असताना मोठ्या प्रमाणात कचरा शहरातील रस्त्यांवर पडलेला दिसत आहे. त्यामध्ये सिमेंट, वीट, वाळू चा कच्चा माल, बॅनर, होर्डींग्जचे लोखंडी पाइप असे साहित्य पडले आहे.
पालिकेने गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्या अंतर्गंत शहरात स्वच्छतेचाही धडाका सुरू आहे. मात्र गेल्या चार दिवसांत पालिकेचे सुमारे 250 कर्मचारी अतिक्रमण मोहिमेत गुंतल्याने शहरातील स्वच्छता मोहीम पूर्णपणे थंडावली होती.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी अतिक्रमण मोहीम थांबवून स्वच्छता मोहीम करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या कामासाठी 35 कर्मचारी उपस्थित होते. दोन पथक करत त्यांनी दत्त चौक ते चावडी चौक आणि बसस्थानक परिसर ते कृष्णा नाका या परिसरातील साहित्य उचलून रस्ते साफ केले. चार ट्रॅक्टर व दोन जेसीबी यांच्याद्वारे साहित्य गोळा करण्यात आले. या मोहिमेमुळे स्वच्छ व सुंदर कराडची संकल्पना पुन्हा सत्यात उतरत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण मोहीम
सोमवारपासून पालिका व पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पोपटभाई पेट्रोल पंप ते भेदा चौक, छ. संभाजी भाजी मार्केट परिसर, रेव्हेन्यू क्लब ते भेदा चौक, कर्मवीर भाऊराव पुतळा ते बापूजी साळुंखे पुतळा, महात्मा फुले पुतळा, आंबेडकर चौक ते जोतिबा मंदिर व मंडई परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
भाजी मंडई परिसरात केले मार्किंग
अतिक्रमण मोहिमेस सोमवार, दि. 2 मार्चपासून पुन्हा सुरूवात होणार आहे. शहरातील काही ठराविक भागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजीमंडई परिसराचा समावेश आहे. या भागात पालिकेच्या वतीने मार्किंग करण्यात आले आहे. हे मार्किंग 5 बाय 5 या साईजचे करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्किंगमुळे आता मंडई परिसरातील व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.