पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना जोडण्यासाठी म्हणजे एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी नितीश देशव्यापी दौरा करणार आहेत.
नितीश यांच्या जेडीयूने काही महिन्यांपूर्वी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्यामुळे भाजपला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्या राजकीय उलथापालथींमुळे जेडीयू आणि भाजपमधील संबंध ताणले गेले. त्यातून नितीश यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार केला आहे.
बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीमुळे ते कॉंग्रेस, राजद या पक्षांशी याआधीच जोडले गेले आहेत. आता आणखी विरोधकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून ते देशव्यापी दौरा करणार आहेत.
जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री केसरकर
पुढील महिन्यात बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर नितीश विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करतील, असे समजते. लोकसभा निवडणूक पुढील वर्षीच्या एप्रिल-मेमध्ये होईल. त्यामुळे नितीश यांच्या भेटीगाठींनी राजकीय वातावरण आधीपासूनच ढवळून निघेल.