पाटणा – बिहार सरकारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शब्दाला महत्व उरले नाही. सरकारचा कारभार भाजपच्या मर्जीनुसार चालतो, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शुक्रवारी केला.
बिहारमध्ये नुकत्याच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या प्रक्रियेवेळी नितीश यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवरून इतरत्र हलवण्यात आले. त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राबडी म्हणाल्या, सरकारी निर्णयांमध्ये भाजपच्या इच्छेला महत्व आलेले दिसते.
पुढील काळात नितीश यांच्या निकटवर्तीयांना बाजूला सारले जाईल. पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना काळजीपूर्वक विचार करायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी नितीश यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी असणाऱ्या राबडी यांनी बिहारमधील सत्तारूढ एनडीएमधील बदललेल्या समीकरणांचा आधार त्यासाठी घेतला.
बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या राज्याची सत्ता राखताना एनडीएची दमछाक झाली. सत्ता मिळाली तरी संख्याबळामुळे एनडीएमधील स्थिती बदलली आहे. नितीश यांच्या जेडीयूपेक्षा अधिक जागा जिंकून भाजप सत्तारूढ आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष ठरला. तसे असले तरी मुख्यमंत्रिपद पुन्हा नितीश यांच्याकडे सोपवण्याला भाजप राजी झाला.