नवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवर भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी एकवटण्याच्या उद्देशातून विरोधी पक्षांच्या गोटात हालचाली सुरू आहेत. अशात सोमवारी दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या. दिल्लीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट झाली. तर, चेन्नईत तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्या घडामोडी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांसाठी बूस्टर ठरण्याची चिन्हे आहेत.
नितीश यांच्या जेडीयूने अलिकडेच भाजपची साथ सोडल्याने बिहारमध्ये सत्ताबदल झाला. त्या राज्याच्या सत्तेतून भाजपला बाहेर पडावे लागले. राजद, कॉंग्रेस आणि इतर पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीशी राजकीय सूत जुळवून जेडीयूने बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर विरोधकांमध्ये एकजूट घडवून आणण्याचे मिशन नितीश यांनी हाती घेतले आहे. त्यासाठी ते देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. देशातील सध्याची राजकीय स्थिती आणि विरोधक एकजुटीची निश्चिती आदींविषयी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
बिहारमधील सत्ताबदलानंतर राहुल आणि नितीश यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली. आता नितीश दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केजरीवाल, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. दिल्लीला रवाना होण्याआधी नितीश यांनी पाटणा येथे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली.
दिल्लीतील घडामोडीप्रमाणेच तामीळनाडूची राजधानी चेन्नईतील घडामोडही लक्षवेधी ठरली. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता असणाऱ्या तामीळनाडूत दिल्लीच्या धर्तीवर मॉडेल स्कूलची योजना राबवली जाणार आहे. त्या योजनेचे उद्घाटन केजरीवाल यांनी चेन्नईतील कार्यक्रमात स्टॅलिन यांच्या उपस्थितीत केले.
दिल्लीचे मॉडेल राबवत असल्याबद्दल केजरीवाल यांनी स्टॅलिन यांची प्रशंसा केली. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन राज्यांनी एकमेकांच्या चांगल्या उपक्रमांचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा केजरीवाल यांनी केली. केजरीवाल यांना लढवय्ये म्हणत स्टॅलिन यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्या दोघांमधील जवळीकही विरोधकांच्या ऐक्याच्या दृष्टीने जमेची बाजू मानली जात आहे.