नवी दिल्ली – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारचा बहुप्रतितक्षित मंत्रिमंडळा विस्तार येत्या १५ तारखेला होण्याची शक्यता आहे. १४ तारखेपर्यंत विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण केली जाणार असून त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. नितीश यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करत १८ जानेवारी रोजी नवे सरकार स्थापन केले आहे. मात्र अद्याप त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
बिहार विधानसभेच्या सदस्य संख्येनुसार मुख्यमंत्र्यांसह ३६ जणांना मंत्री केले जाउ शकते. तूर्त नितीश यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपद स्विकारले आहे. २७ जागा अद्याप रिक्त आहेत. या सगळ्याच जागा भरल्या जाणार नाहीत. काही रिक्तही ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जातीय समीकरणांचा विचार करूनच मंत्र्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून आतापर्यंत सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा आणि प्रेमकुमार मंत्री झाले आहेत. सम्राट चौधरी आणि सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे प्रत्येकी ९ विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. भाजपच्या राजकारणाची रूपरेषा पाहता किमान ४० टक्के नव्या चेहऱ्यांना त्यांच्याकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपाचे काय?
लोकसभा निवडणुकीचे जागावाटपही लवकरच होणार आहे. लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती पारस यांच्यात समझोता व्हावा अशी भाजपची इच्छा होती. ती अद्याप झालेली नाही. तसेच मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्षही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होतो आहे. त्यामुळे भाजप ४० पैकी १९ जागांवर लढेल. पशुपती पारस, प्रिन्स राज आणि चंदन सिंह हे तीन जण भाजपच्या चिन्हावर लढतील तर संयुक्त जनता दलाला १४ जागा आणि चिराग पासवान यांच्या गटाला लोकसभेच्या चार तर राज्यसभेची एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे. अन्य दोन सहकारी पक्षांनाही प्रत्येकी १ जागा दिली जाणार आहेत.
चिराग पासवान यांना इंडिया आघाडीनेही ऑफर दिली आहे. त्यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार चिराग यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आली असून ते एनडीएमध्ये राहुनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे.