लखनौ – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना सनसनाटी दावा केला. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण ढवळून निघालं आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून पाटणा येथे राबडी देवी माध्यमांशी बोलत होत्या.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले नितीश कुमार आपल्या हतबलतेमुळे लखनौमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले, असा दावा राबडी देवी यांनी केला. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नितीश कुमार शुक्रवारी लखनौमध्ये होते.
दिमाखदार शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार यांच्या देहबोलीतून बरेच काही दिसून येतं अस म्हणत, पंतप्रधानांना वाकून अभिवादन करतानाची त्यांची छायाचित्रे विरोधकांनी उचलून धरली आहेत.
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नितीश कुमार आणि मोदीचं शत्रुत्व सर्वांनाच ठावूक आहे. नितीश यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेमुळे भाजपशी त्यांचे संबंध खराब झाले होते. मात्र आता ते भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राबडी देवी यांनी केला.
दरम्यान काही तरी मजबुरी असावी, ज्यामुळे नितीश कुमार पंतप्रधानांच्या पाया पडले असावे, असा टोलाही राबडी देवी यांनी लगावला.