नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असावा यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कालच्या बैठकीत पंतप्रधान पदासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा चेहरा पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही ममतांच्या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार खर्गे यांचे नाव पुढे आल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार नाराज आहेत. त्या पाश्र्वभूमीवर चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
नितीश कुमार यांचे दलित विरोधी विचार आणि मानसिकता कोणापासून लपून राहीलेली नाही. त्यांना ही गोष्ट (खर्गेंचे नाव) मान्यच होऊ शकत नाही. माझे पिता रामविलास पासवान यांचा त्यांनी सातत्याने अपमान केला कारण ते दलित समुदायाचे होते. वारंवार त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले गेले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात उल्लेख केला आहे याकडे चिराग पासवान यांनी लक्ष वेधले.
आपल्या अखेरच्या दिवसात रामविलास पासवान हे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाही यासाठी त्यांचा कशा प्रकारे छळ करण्यात आला याचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला असल्याचे सांगत नितीश यांना हे सहनच (दलित व्यक्ती) होणार नाही असा आरोप चिराग यांनी केला.
अगदी अलिकडच्या काळात बिहारच्या विधानसभेत नितीश यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि दलित नेते जीतनराम मांझी यांचा कशा प्रकारे उल्लेख केला याकडे लक्ष वेधत चिराग म्हणाले, नितीश यांचे विचारच दलितविरोधी असल्याचे त्यातून स्पष्ट होते. कालच्या इंडियाच्या बैठकीत खर्गे यांचे नाव आल्यावर नितीश यांचे अस्वस्थ होणे आणि बैठकीतून अचानक निघून जाणे यातून एकच सिध्द होते की दलित व्यक्ती पुढे जावी अशी त्यांची इच्छा नाही.