नाशिक : ’भावी मुख्यमंत्री’ आदित्य ठाकरे यांचे ठाकरे गटाच्या नेत्यांनी बॅनर लावलेत. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली आहे. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत, असं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनतर आदित्य ठाकरेंचाही ‘भावी मुख्यमंत्री’ उल्लेख असलेले बॅनर नागपुरात लावण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘बॅनर्स’ हा चर्चेचा विषय ठरत असून, राष्ट्रवादीच्या अनेक राजकीय नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे लिहिण्यात आलेले बॅनर्स लावण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आलं.
अशात या बॅनरमुळे पुन्हा राजकारण तापले आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नितेश राणेंच्या दौऱ्या पूर्वी त्रंबकेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तिथे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.