मुंबई : कणकवली मतदारसंघातून नितेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील. भाजपच्या दुसऱ्या यादी त्यांचे नाव निश्चितपणे असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी व्यक्त केला.
राणे पटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. नितेश राणे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले. तेव्हा भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून ते विजयी झाले. जठार यांनी नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फाडून टाकला होता. जठार यांना भाजपात तुमच्या शब्दाला मन दिला जाईल असे आश्वासन दिले होते. हि पार्श्वभूमी राणे यांच्या प्रवेश नाट्याला आहे.
यंदाच्या निवडणुकीत मात्र तेथील सगळी गणितं बदलली असून काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नितेश राणे यांचे भाजपच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. शिवसेनेच्या विरोधामुळे राणे कुटुंबीयांचा भाजप प्रवेश लांबला असला तरी नितेश यांना भाजपची उमेदवारी मिळेल, याची पूर्ण खात्री नारायण राणे यांना आहे.
नितेशला भाजपकडून कणकवलीतून उमेदवारी मिळेल. नितेशचं नाव भाजपच्या दुसऱ्या यादीत असेल. तो कणकवलीतूनच निवडणूक लढवणार आहे, असे राणे म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये आठवडाभरात विलीन होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान भाजपच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही प्रमुख नावे आहेत. मात्र, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची नावे नसल्याने पक्षात अस्वस्थता आहे. खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.