लंडन – फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्याविरोधात भारत सरकारने दाखल केलेल्या प्रत्यार्पण खटल्याची सुनावणी आजपासून सुरू झाली. पंजाब नॅशनल बॅंकेतील 2 अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासासाठी नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे भारत सरकारने केली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू असल्याने या सुनावणीसाठी नीरव मोदीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी करून घेतले होते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक झाल्यापासून नीरव मोदीला दक्षिण-पश्चिम लंडनमधील वॅन्डस्वर्थ तुरुंगातच ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पुरावे नाहीसे करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा आणि धमकावण्याचाही आरोप लावण्यात आला आहे.
पूर्वी मान्य केल्याप्रमाणे काही मोजके कायदेशीर प्रतिनिधी कोर्टाच्या कक्षात उपस्थित होते, तर साक्षीदारांनी आपला पुरावा व्हिडिओलिंकद्वारे देण्यास सांगितले गेले. ही सुनावणी 5 दिवस चालणार असून गेल्या वर्षी ब्रिटन सरकारने भारत सरकारची प्रत्यार्पणाची विनंती प्रमाणित केली आहे.
भारताकडून “क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिस’च्या वकिल बॅ. हेलेन माल्कम यांनी बाजू मांडली. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेतून फसवेगिरी करून प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला. या प्रकरणात गैरव्यवहार, गैरव्यवहार केलेल्या पैशातून मनी लॉन्डरिंग आणि मोदी याच्या साम्राज्यातील वस्तूंची फिरवाफिरवी केल्याचे तीन प्रमुख भाग असल्याचे त्यांनी सांगितले.