ऊसटंचाई असताना गाळप हंगाम जोरात : मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार
रेडा- पुणे व सोलापूर जिल्ह्यात जवळपास एक डझनावर सहकारी तत्वावर चालणारे व खासगी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने केवळ उसाची कमतरता असल्यामुळे बंद अवस्थेत आहेत. परंतु माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील साखर कारखान्याचा गाळप हंगाम राज्यांमध्ये अडचणीचा असतानादेखील तब्बल 72 हजार 450 टन उसाचे गाळप रविवारी (दि. 22) पर्यंत कारखान्याने करून सभासदांचे हित जोपासले आहे. तीन लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन, संचालक मंडळाचे लक्ष यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना व छत्रपती सहकारी साखर कारखाना हे तीन कारखाने असताना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे युनिट अगदी छोटे आहे. तरीदेखील प्रतिदिन 3500 ते 3600 टन उसाचे गाळप विनाथांबा नीरा-भीमा कारखाना करीत आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याने आत्तापर्यंत 61 हजार 155 उसाचे गाळप केले आहे.
नीरा भीमा सहकारी कारखान्याचे संस्थापक पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, असे नियोजन संचालक मंडळांकडून करून घेतले आहे. ऊस तोडणी यंत्रणा व टोळ्यांची संख्या कमी असताना देखील प्रशासनाच्या नियोजनामुळे 24 तास विनाथांबा कारखाना सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतातील सर्व ऊस नीरा-भीमा कारखान्याला गाळपासाठी देण्याचे धोरण ठरवले आहे. नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे व कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी ऊस तोडणीचा प्रोग्रॅम तंतोतंत आखला आहे. त्यामुळे एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही.