निमोणे – पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिला पाणी आणण्याच्या बहाण्याने विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची घटना निमोणे (ता. शिरुर) येथे घडली असुन बाबासाहेब रामभाऊ धस यांनी याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन पत्नीचा खून करणाऱ्या ऊस तोड मजुरास पोलिसांनी अटक केली असुन त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पति-पत्नी जालना जिल्ह्यातुन निमोणे येथे ऊस तोडणीसाठी आले होते. सोमवार (दि ३) रोजी सुनिता बाबासाहेब सावंत (वय ३६) मुळगाव: रा. वंजारवाडी, ता. बदनापुर जि. जालना या महिलेचा मृतदेह निमोणे येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत तरंगत असल्याची माहीती शिरुर पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन अधिक तपास केला असता सदर महिला आणि तिचा पती बाबासाहेब तेजराव सावंत हा ऊसतोड चालू असताना सकाळी १० च्या सुमारास जवळच असणाऱ्या विहिरीकडे पाणी आणण्यासाठी गेले असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. तसेच तेव्हापासुनच सदर महिलेचा पती फरार झाला होता. त्यामुळे त्याच्याबाबत संशय बळावल्याने शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करुन तात्काळ तपास चालू केला. मंगळवार (दि ४) रोजी सदर आरोपी निमोणे-न्हावरे रस्त्यावर पळुन जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली.
पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर आरोपींने आपणच चरित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलिस हवालदार संजू जाधव, पोलीस नाईक नाथा जगताप, धनंजय थेऊरकर, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, संतोष साळुंके यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.