उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन.
हे विक्रमा तुला माहीत आहे की मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर आहेच व स्वप्ननगरीही आहे. विविध प्रांतातील लोक काहीतरी स्वप्न घेऊन या मायानगरीत येत असतात व मेहनत करणाऱ्यांना ती कधीही निराश करत नाही. आपण अशा अनेक गोष्टी ऐकत असतो की कित्येक लोक फक्त नेसल्या वस्त्रांनीशी या शहरात आले होते अगदी आपला देश वा प्रांत सोडून काहीतरी करण्याच्या जिद्दीने. यातूनच कित्येक कलाकार, गायक, नट, खेळाडू झाले. छोटेमोठे उद्योग करून आता कोट्यधीश झाले. तर सांगायचा मुद्दा हा की सर्वांना सामावून घेणारी ही मुंबई आहे. आता वेगळा मुद्दा मांडतो.
आता या मुंबईबाबत एक नवीन विषय येत आहे तो म्हणजे नाइट लाइफचा. जगभरातल्या मोठमोठ्या शहरात रहिवासी क्षेत्र सोडून रात्रभर दुकाने, मॉल, पब, हॉटेल्स थिएटर्स चालू ठेवण्याचा प्रस्ताव आहे. तसे झाल्यास जगातील तशा प्रकारच्या शहरांमध्ये मुंबईचेही नाव घेतले जाईल. कधीही फिरता येईल असा हा प्रस्ताव आहे. तसेच असे झाल्यास रोजगारातही वाढ होईल कारण असे सर्व चालू ठेवण्याकरता मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरात लवकर झाल्यास चांगलेच होईल. काही लोकांना रोजगार मिळेल. आधीच आपण मंदी म्हणत आहोत तर यामुळे नक्कीच फायदा होईल. विक्रमा तुझ्या चेहऱ्यावरून तरी मी म्हणतोय ते तुला ठीक वाटलेले दिसत नाही.
विक्रम म्हणाला, हे वेताळा तू म्हणतोस त्यात नक्कीच थोडे फार तथ्य आहे. हा प्रस्ताव मागच्या सरकारात देखील आला होता. पण दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सुरक्षेचं काय? मुंबई ही दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. त्यामुळे पोलिसांवर आधीच ताण आहे व तो अजून वाढेल. त्यामुळे कोणतेही पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल. दुसरे म्हणजे जी काही रोजगार निर्मिती होईल ती जास्त अनुत्पादिक भागातून होईल. रात्रभर अशा गोष्टींकडे जाण्याच्या लोकांचा कल वाढेल पण आपण पाहतो की अशा गोष्टीकरता पैसा नसेल तर जमेल त्या मार्गाने तरुण वर्ग तो जमवण्याचा प्रयत्न करतो व यातून गुन्हेगारी वाढीस लागते. म्हणजे अशा गोष्टी बनवू नये असे नाही पण त्या करता उत्पादक रोजगार निर्मिती होणे जरुरीचे आहे.
सर्वप्रथम कृषी क्षेत्रात जास्त गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना किमान हमी भाव देऊन त्यांचा माल केव्हाही घेता येईल असे उद्योग विकसित करणे महत्त्वाचे आहे. मग त्याच अनुषंगाने इतरही उद्योग निर्माण होतील.अशाने खरा रोजगार वाढेल अशी रोजगारनिर्मिती झाली की त्यांना मिळणारा पैसा खर्च करण्याकरता असे हॉटेल्स, मॉल वगैरे लागतील व त्या वेळी येथे नवीन किंवा जुने असलेले मॉल्स वगैरे रात्रभर चालू ठेवणे इष्ट ठरेल. बेरोजगारीने कळस गाठला असताना असा निर्णय घेणे म्हणजे तरुणांना वाम मार्गाला लावण्यास उद्युक्त करणे ठरेल. त्यामुळे सर्वप्रथम उत्पादक उद्योग वाढवून त्यात रोजगार वाढवण्याकरता कार्य करणे महत्त्वाचे ठरेल.
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस तेच खरे सत्य आहे हे मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.