“परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
नवी दिल्ली : आपल्यासाठी काय महत्वाचे आणि काय नाही हे अगोदर मुलांनी समजून घेण्याची गरज आहे. स्मार्टफोन आपला वेळ वाया घालवतो. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणाखाली असल्यायला हवे. म्हणूनच तंत्रज्ञानाशी मैत्री हवी, पण त्याची गुलाम नको, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी “परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसतो. यामुळे बहुतेक मुलांचा अमुल्य वेळ वाया जात आहे. त्याचा सकारात्मक गोष्टींसाठी वापर कसा करता येईल, यावर त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळाली. मोदी म्हणाले, स्मार्टफोनवर तुम्ही किती वेळ खर्च करता, त्यातील 10 टक्के वेळ कमी करुन आपल्या आई-वडील, आजी-आजोबा आणि कुटुंबासोबत व्यतीत करा. तंत्रज्ञान तुम्हाला नेहमीच आकर्षीत करते. मात्र, त्याचा वापर तुम्ही तुमच्या मर्जीने करायला हवा, असेही मोदी म्हणाले.
विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायच असेल तर अपयशातून शिकले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे याने वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात जखमी असूनही केलेली खेळी आणि राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात केलेल्या 376 धावांच्या भागीदारीचे उदाहरण देत सकारात्मक विचार आणि प्रेरणेची ही शक्ती असल्याचे सांगितले. तसेच चंद्रावरील सॉफ्ट लॅंडिंगच्या अपयशामध्येही सकारात्मकता कशी दडली आहे, ते विद्यार्थ्यांना पटवून दिले.