मुंबई – देशातील करोना रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात कमी होत आहे त्याच प्रमाणात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उसळत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सोमवारी नव्या उच्चांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सला पुन्हा 52,000 अंकाचे वेध लागले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅक, एअरटेल, मारुती, ऍक्सिस बॅंक, एनटीपीसी, आयटीसी या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. बाजार बंद होताना निफ्टी शुक्रवारच्या तुलनेत 0.95 टक्क्यांनी म्हणजे 147 अंकांनी ऊसळून 15,582 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर सेन्सेक्स 514 अंकांनी म्हणजे एक टक्क्यांनी उसळून 51,937 अंकांवर विराजमान झाला. हा निर्देशांक लवकरच 52,000 अंकाची उच्चांकी पातळी सर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या तेजीच्या वातावरणातही महिंद्रा, इन्फोसिस, एल अँड टी, टेक महिंद्रा कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला आणि या कंपन्यांचे शेअर 4.53 टक्क्यांपर्यंत घसरले. चौथ्या तिमाहीचे ताळेबंद अपेक्षेपेक्षा चांगले जाहीर होत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीवर थोडाफार परिणाम होऊ शकतो. मात्र नंतरच्या तीन तिमाहीत कंपन्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते.
त्यामुळे एकतर्फी जोरदार खरेदी चालू आहे असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सध्या जास्त वाढ होत आहे. धातु, खासगी बॅंका, ऊर्जा क्षेत्र अर्थव्यवस्था विस्तारणार असल्यामुळे तेजीचे नेतृत्व करीत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी निर्देशांकात थोडीफार घट झाली होती. मात्र नंतर जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर दिवसभर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याचे दिसून आले. मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप मात्र अर्धा टक्क्यापर्यंत वाढले.
अमेरिका आणि युरोपमधील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू होऊ लागले असल्यामुळे जागतिक बाजारातूनही खरेदीचे वातावरण असल्याचे दिसून आले. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे क्रुडच्या भावात एक टक्क्याने वाढ नोंदली गेली . आज रुपयाचा भाव काही प्रमाणात घसरला असला तरी गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून खरेदी केल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.