NIA Raids – एनआयएने बुधवारी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणाऱ्या मानवी तस्करी नेटवर्कवर मोठी कारवाई केली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याबाबत माहिती दिली आहे. एजन्सीने बुधवारी सकाळी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) आणि राज्य पोलीस दलांच्या मदतीने भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. या कालावधीत मानवी तस्करीच्या चार प्रकरणात 44 जणांना अटक करण्यात आली आहे.
एकत्र टाकला छापा –
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरू, जयपूर येथील एनआयएच्या शाखांमध्ये मानवी तस्करीसंदर्भात चार गुन्ह्यांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत, दहशतवादविरोधी एजन्सीने त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 55 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
भारतीय आणि विदेशी चलनही जप्त –
यादरम्यान एनआयएने मोबाईल फोन, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्ह यांसारखी डिजिटल उपकरणे जप्त केली. याशिवाय आधार कार्ड आणि पॅनकार्डसह मोठ्या प्रमाणात ओळखीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. यासोबतच 20 लाख रुपयांच्या भारतीय नोटा आणि 4550 अमेरिकन डॉलर (3,78,819 रुपये) जप्त करण्यात आले आहेत.
44 जणांना अटक –
यासोबतच या छाप्यात एकूण 44 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्रिपुरातून 21, कर्नाटकातून 10, आसाममधून 5, पश्चिम बंगालमधून 3, तामिळनाडूमधून 2 आणि पुद्दुचेरी, तेलंगणा आणि हरियाणामधून प्रत्येकी 1 जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दलाल बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना देशाच्या विविध भागात पाठवत असत.