नवी दिल्ली – भारताविरोधात चीनकडून सातत्याने काही-ना-काही कुरापती सुरूच असतात. आता चीनकडून भारतीय हद्दीतील दक्षिण लडाखजवळील पेगॉंग त्सो लेकवर एका पूलाचे बांधकाम सुरू आहे. यावर भारताने आक्षेप घेतला असून हा पूल अवैध असल्याचा दावा केला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की चीनचा हा पूल अवैध असून त्याने त्वरीत याचे बांधकाम थांबवावे. या घटनेवर भारताची नजर असून देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी अत्यावश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचेही परराष्ट्र प्रवक्त्यांनी सांगितले.
जवळपास 140 किमी लांबी असलेल्या पेगॉंग त्सो लेकच्या दोन तृतीयांश हिस्सा म्हणजे 100 किमीवर चीनच्या ताब्यात आहे. याच लेकवर आता चीन एक पूल बांधत असल्याचे एका सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला चीनने अरुणाचल प्रदेशात 15 भागांसाठी चिनी नावांची घोषणा केली होती. तसेच चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश “झांगनान’ किंवा “दक्षिण तिबेट’ म्हणून चिन्हीत करण्यात आले.
याशिवाय नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या कृतीनंतर भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत गलवान खोऱ्यात भारताचा ध्वज फडकविण्यात आला. याचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत.