पुणे – सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत महापालिका निवडणूक प्रक्रियेसंदर्भात दिलेले आदेशाची मुदत येत्या मंगळवारी संपुष्टात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार प्रभाग रचना जाहीर केली. आता, महिला आरक्षणाच्या सोडतीची कामकाज तातडीने पूर्ण करावे लागत असल्याने मंगळवारी (दि.31) महिला आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 50 टक्के आरक्षण आणि तीनच्या प्रभागरचनेमुळे महापालिकेतील 29 माजी नगरसेवकांवर यापूर्वीच टांगती तलवार आहे. या नगरसेवकांना एक तर प्रभाग बदलावा लागेल किंवा स्वत:ऐवजी घरातील किंवा पक्षातील अन्य महिला कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
50 टक्के आरक्षणामुळे…
स्वराज्य संस्थांमध्ये 2011 मध्ये स्थानिक महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्यात आले. राज्य सरकारकडून लोकसंख्या आणि महापालिकेच्या सदस्यसंख्येच्या निकषात बदल केले. त्यामुळे महापालिकेची सदस्य संख्या 173 वर गेली. त्यामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्यामुळे महिला सदस्यांची संख्या 87 एवढी होणार होती. त्यानुसार 58 प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा महिलांसाठी तर एक जागा पुरुषांसाठी राखीव राहणार आहे. तर दोन सदस्यांच्या प्रभागात एक महिला आणि एका पुरुषांसाठी जागा राखीव राहणार आहेत.
20 वर्षांनंतर आता पुन्हा…
महापालिकेत महिलांसाठी जागा राखीव ठेवल्यानंतर उर्वरित 29 महिलांना लॉटरीपद्धतीने आरक्षण द्यावे लागणार असल्याचे अधिकारी सांगतात. यापूर्वी 2002 मध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण होते. त्यामुळे महापालिकेत 48 महिला प्रतिनिधी निवडून आल्या होत्या. 20 वर्षांनंतर आता पुन्हा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूका होत आहे. यंदा मात्र 50 टक्के महिला आरक्षण आहे.
गतपंचवार्षिंकची स्थिती…
महापालिकेची 2017 मध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक झाली होती. त्यावेळी 42 प्रभाग होते. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. कारण, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता होती. त्यापूर्वी 2002 मध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणूक झाली. त्यावेळी 48 प्रभाग होते. त्यामध्ये दोन प्रभाग हे चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग असे होते. त्यावेळी भाजपचे सर्वाधिक म्हणजे 35 तर शिवसेनेचे 21 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढले होते.