मुंबई – केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपची बांधणी करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशात लखीमपुर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार गाडी घालून त्यांना चिरडून ठार मारण्याचा जो प्रकार घडला होता त्या प्रकरणात त्यांचा मुलगा अशिष मिश्रा हा प्रमुख आरोपी असून तो सध्या कारागृहात आहे. त्यावरून अजय मिश्रा यांच्याहीं राजीनाम्याची मागणी विरोधकांनी संसदेत लाऊन धरली होती.
त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात ते भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका घेतील आणि विकासकामांचा आढावा घेतील, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.यांनी सांगितले.भाजपने लोकसभेची तयारी आता सुरू केली असून अजय मिश्रा यांचा हा दौरा म्हणजेच त्याच तयारीचा भाग मानला जात आहे.