नवी दिल्ली – कोट्यवधी कुटुंबांना स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन सध्या उपलब्ध नसल्यामुळे देश “बेरोजगारीच्या महामारी”शी झुंज देत आहे, परंतु सरकार केवळ “अहंकारी राजा” ची प्रतिमा चमकवण्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करीत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. जनतेने या परिस्थितीत स्वताला असाह्य किंवा एकटे समजू नये कॉंग्रेस पक्ष तुमचा आवाज बनून सरकारच्या विरोधात लढेल असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेत महागाईवर झालेल्या चर्चेच्या एका दिवसानंतर एका फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, संसदेच्या चालू अधिवेशनात कॉंग्रेसने सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधी खासदारांचे निलंबन, निषेधार्थ अटक असे हतखंड अवलंबून सरकारने ही चर्चाच हाणून पाडली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काल जेव्हा लोकसभेत चर्चा झाली त्याला उत्तर देताना सरकारने देशात महागाईची कोणती समस्याच अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. देश बेरोजगारीच्या महामारीशी झुंज देत आहे, कोट्यवधी कुटुंबांना स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. परंतु सरकार केवळ ‘अहंकारी राजा’ची प्रतिमा चमकवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे,” असे ते म्हणाले.
देशातील जनतेला उद्देशून केलेल्या दीर्घ पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, “स्वतःला एकटे समजू नका, कॉंग्रेस हा तुमचा आवाज आहे आणि तुम्ही कॉंग्रेसची ताकद आहात. आपल्याला हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी लढायचे आहे, लोकांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न जारी आहेत पण त्याच्या विरोधात आपण एकजुटीने लढायचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
तुमच्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि मी लढत आलो आहे, आणि लढत राहीन. सरकारच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाचा तुमच्या जीवनावर परिणाम होत आहे, असे ते म्हणाले. महागाई आणि गब्बर सिंग टॅक्स हा सर्वसामान्यांच्या उत्पन्नावर थेट हल्ला आहे.आजचे वास्तव हे आहे की सामान्य माणूस त्यांच्या स्वप्नांसाठी नाही तर रोजच्या भाकरीसाठीही संघर्ष करत आहे,
हुकूमशहाने काहीही न विचारता जे काही सांगितले ते तुम्ही स्वीकारावे अशी या सरकारची इच्छा आहे. मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की, त्यांना घाबरून हुकूमशाही सहन करण्याची गरज नाही. ते भित्रे आहेत, तुमच्या सामर्थ्याला आणि ऐक्याला ते घाबरतात आणि म्हणूनच ते सतत हल्ले करत आहेत. जर तुम्ही त्यांचा एकजुटीने सामना केलात तर ते घाबरतील,असे राहुल गांधी यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. आम्ही त्यांना जनतेला घाबरवू देणार नाहीं असेही त्यांनी नमूद केले.