छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर जिल्हातील नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी खोके घेतले, असा आरोप शिवसेनेचे(शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात आणले गेले, असा टोलाही शिरसाट यांनी यावेळी लगावला आहे.
शिरसाट पुढे बोलताना, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये 3 अपक्ष आमदारांना मंत्रिपद का देण्यात आली?, असाही सवाल उपस्थित केला. तसेच यावर उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधी सभेत बोलावे असेही त्यांनी म्हटले आहे. “आम्ही ते उद्धव ठाकरे बघितले आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे.
म्हणजे तेव्हा राष्ट्रीय नेतृत्व उद्धव ठाकरेंचे झाले होते. मात्र, त्यांना अजित पवार आणि नाना पटोले यांच्या लेव्हलवर आणूण बसवले आहे. म्हणून शरद पवार आज नागपुरात असून सभेला आले नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर उद्धव यांच्या या सहानुभुतीचा फायदा अजित पवार घेत असून मविआमध्ये तेच भावी मुख्यमंत्री म्हणून फिरत आहे,’ असेही शिरसाट यांनी पुढे म्हटले.
अपक्षांवर महेरबानी का?
“मविआच्या काळात बहुमत असताना व शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ आमदार असताना 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे अपक्ष आमदारांना का देण्यात आली. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत देवाची, दिवगंत बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगावे, की शंकरराव गडाख यांना मंत्रीपद का दिले? त्यांनी पक्षांच्या एका तरी बैठकीला हजेरी लावली होती का? मग ही महेरबानी का दाखवली. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी किती खोके घेतले?,’ असेही शिरसाट यांनी पुढे म्हटले.
आंबेडकर स्टेजवर का नाही?
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याशी उद्धव ठाकरेंनी युती केली. मात्र, आजच्या सभेत ते स्टेजवर कुठेही नाहीत, असे का? केवळ गरज पडेल तसे लोकांना वापरुन घ्यायचे असे त्यांचे काम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. ही सभा म्हणजे हतबल सभा आहे. ठाकरेंचे कार्यकर्ते नाही तर स्टेजची पाहणी बाळासाहेब ज्यांच्याविरोधात लढले ती लोक करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.