पोर्ट ऑफ स्पेन – कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज शतक टोलवित भारताच्या विजयाचा पाया रचल्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारने चार विकेट्स घेत त्यावर कळस चढविला. या सामन्यात श्रेयस अय्यरने 68 चेंडूत 71 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यानंतर श्रेय्यस याने कोणत्याही स्थानावर खेळण्याची माझी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, ‘मधल्या फळीत भक्कम कामगिरी करणाऱ्या फलंदाजांचा शोध भारत घेत होता. त्यादृष्टीनेच माझ्याकडे पाहिले जात होते. मी काही अंशी ही कामगिरी फत्ते करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मधल्या फळीत नव्हे तर कोणत्याही स्थानावर खेळण्याची माझी तयारी आहे’. तसेच संघासाठी ही जबाबदारी पार करणे महत्त्वाचे असते, असे श्रेयस अय्यरने सांगितले.
दरम्यान, कालच्या सामन्यातील कामगिरीचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कौतूक केले आहे. मधल्या फळीत संघाचा डाव भक्कम करण्यासाठी ऋषभ पंतपेक्षा श्रेयस अय्यर हाच योग्य पर्याय आहे. मात्र त्याला दीर्घ काळ त्या स्थानावर खेळण्याची संधी दिली पाहिजे असे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सांगितले.