मुंबई – महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी एका भाजप नेत्यानेच एमआयएम पक्षाला तो युतीचा प्रस्ताव द्यायला लावला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. ते म्हणाले की आम्ही युतीचा प्रस्ताव घेऊन एमआयएमकडे गेलो नव्हतो.
भाजपच्या सांगण्यावरूनच त्यांनी आमच्याकडे तसा प्रस्ताव मांडला आहे असे ते म्हणाले. आम्ही हे कारस्थान उधळवून लाऊ. हे भाजपनेच रचलेले कारस्थान आहे असे ते म्हणाले. वास्तविक एमआयएम हा पक्ष भाजपचाच सहकारी पक्ष असून त्यांच्यात छुपी युती आहे हे देशातील सर्वांच्या लक्षात आले आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.
आजच्या शिवसेनेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली. त्यांनी सांगितले की पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही मराठवाडा आणि विदर्भातील 19 जिल्ह्यात जाणार आहोत. प्रत्येक खासदाराकडे एकेक जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे असेही त्यांनी नमूद केले.
काश्मीरवरून भाजपने सध्या चालवलेल्या प्रचाराविषयी बोलताना ते म्हणाले की भाजपच्याच लोकांनी काश्मीरात महबुबा मुफ्ती सरकारशी आघाडी केली होती. त्यामुळे त्यांच्या हिंदुत्वातच भेसळ आहे, आमचे हिंदुत्व शुद्ध आहे असेही त्यांनी नमूद केले.