देहूगाव–
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी। सकाळा सांगावी विनंती माझी।।
वाढ वेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंगा बोलावितो।।
अंतःकाळी विठू आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा फाल्गुन वद्य द्वितीया 374 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज उत्सव साजरा झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त रविवारी (दि. 20) रणरणत्या उन्हात श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या समोर व भक्तनिवासाच्या आवारात दुपारी बारा वाजता या भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर मनोभावे बुक्का व तुळशी पानफुले उधळण केली. हा अनुपम सोहळा याचि देही याची डोळा पहायला मिळाल्याने आपले जीवन धन्य झाल्याची भावना मनोमन ठेवत माघारी फिरले.
गेली दोन वर्षांपासून सुरू असलेल्या करोना महामारी संकटामुळे गतवर्षी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बीज सोहळा पार पडला होता. करोनाचे नियम शिथिल झाल्याने यंदा भाविकांनी देहूत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोष सुरू होता. बीज सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात आणि गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री व पहाटे हवेत गारवा असला तरीही सकाळी दहा वाजल्यानंतर मात्र उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवू लागला होता. अशा उन्हातही भाविकांच्या मुखी हरिनाम व अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.