पोर्ट ब्लेअर – अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनारी भागात राहणा-या लोकांना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सुरक्षिततेसाठी हलवण्यात आले आहे. रविवारी आसनी चक्रीवादळामुळे द्वीपसमूहात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले आहे. या बेटाच्या दिशेने येणाऱ्या सर्व जहाज सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
चेन्नाई आणि विशाखापट्टणम येथून या बेटाशी नियमीत जहाज संपर्क होत असतो. चक्रीवादळाच्या धोक्याने अंदमान निकोबार येथे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स चे सुमारे 150 जवान तैनात करण्यात आले आहेत आणि या बेटांच्या विविध भागात सहा मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चक्रीवादळाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना केली असल्याने नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या राजधानी पोर्टब्लेअर सह बेटांवरील अन्य ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अंदमान-निकोबार बेटावरून हे वादळ बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची अपेक्षा आहे.चक्रीवादळामुळे तेथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.