मुंबई – शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केलेली युती अनैसर्गिक असेल तर भाजपने 2019 राष्ट्रवादी बरोबर केलेली युती नैसर्गिक होती काय असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सन 2019 मध्ये भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केले होते पण हे सरकार केवळ तीन दिवसांतच कोसळले होते याची आठवण करून देतानाच राऊत यांनी त्यांची त्यावेळी केलेल्या युर्तीला नैसर्गिक म्हणता येते काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केलेल्या युतीला आक्षेप घेत बंडखोर शिवसेना आमदारांनी ही युती अनैसर्गिक असल्याचे नमूद केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी हा सवाल केला.
पक्षाच्या मुखपत्रात लिहीलेल्या स्तंभात राऊत यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अजित पवारांनी 2019 मध्ये बंडखोरी करून फडणवीसांसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी त्या युतीला विरोध केला नव्हता की त्यांनी राष्ट्रवादीकडून आपला पक्ष संपवला जाईल याची भीती वाटली नव्हती अशी टिप्पणीही राऊत यांनी केली आहे. भाजप-राष्ट्रवादीची युती कायम राहिली असती तर त्याला अनैसर्गिक युती म्हणायचे का? राजकारणात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक असे काहीही नसते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
सन 2014 मध्येही जेव्हा सरकार स्थापनेला विलंब झाला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला त्यांच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला होता याचीही आठवण राऊत यांनी करून दिली आहे.शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समीकरण चांगले आहे. तेव्हा भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारला नव्हता असे ते म्हणाले.दीपक केसरकर आणि उदय सामंत यांसारखे बंडखोर आमदार, जे आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे छावणीत गेले आहेत त्यांनी पवारांच्या शाळेचे प्रमाणपत्र घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता, असा टोला राऊत यांनी लगावला.
केसरकर आणि सामंत शिवसेनेत येण्यापूर्वी राष्ट्रवादीत होते.