मुंबई – गेल्या काही दिवसांपासून जात-धर्माच्या नावाने पुन्हा एकदा या समाजाला व देशाला मागे न्यायचा प्रयत्न सुरू आहे. महागाई, बेरोजगारी व अन्नधान्याची दरवाढ हे लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत. मात्र, हे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत आणि संपूर्ण समाजाला या मुख्य प्रश्नांपासून दूर नेले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व मागासवर्गीय सेलतर्फे आज कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या एकदिवसीय मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य केले.
पवार म्हणाले की, आम्ही हनुमान चालीसा लावणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, अशाच मागण्या केल्या जात आहेत. या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या भूकेचा प्रश्न सुटणार आहे का? अशाप्रकारे मूळ प्रश्नांना बगल देऊन अन्य प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याचा पवित्रा समाजातील काही घटकांनी घेतला आहे. त्यांना उत्तर द्यायचे असेल तर शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार हाच एक उपाय आहे.