मुंबई – राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती, असे म्हटले होते. त्यावर शरद पवार यांनी फडणवीस हे सभ्य राजकारणी आहेत असे वाटले होते. मात्र याबाबत ते असत्याचा आधार घेत आहेत, असेही म्हटले होते. मात्र पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली, असे वक्तव्य शरद पवार यांनी आज केले. यावरून पुन्हा खळबळ उडाली असून फडणवीस यांनी त्यांना आणखी एक आव्हान दिले आहे.
शरद पवारांनी खुलासा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एक प्रश्न विचारला आहे. या खुलाशानंतर, आता माझी शरद पवार जी यांच्याकडे अजून अपेक्षा आहे की त्यांनी हे ही सांगावे की राष्ट्रपती राजवट का लागली, कुणाच्या सांगण्यावरून लागली? असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे. या प्रश्नाला शरद पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात मोठा दावा केला होता. ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करून सर्वकाही ठरले होते. पण नंतर गोष्टी बदलल्या, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवारांनी आज खुलासा केला आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात जी राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली, असे मोठे विधान त्यांनी आज केले. याचाच अर्थ पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा छुपा पाठिंबा होता हे सिद्ध होते, अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.