नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत भारतीय सशस्त्र दलांनी चीनी आक्रमकतेला मोठ्या शौर्याने तोंड दिले. त्यामुळे चीनी सैनिकांना माघारी जाण्यास भाग पडले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी म्हटले.
चीनी कुरापतींमुळे काही महिन्यांपासून एलएसी म्हणजेच सीमेलगत तणावाची स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर, फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना राजनाथ यांनी भारतीय दलांच्या शौर्याची प्रशंसा केली. त्या दलांनी चालू वर्षात केलेल्या कामगिरीचा अभिमान देशाच्या भावी पिढ्यांनाही वाटत राहील.
कुठल्याही देशाच्या इतिहासात स्वत:साठी उभे ठाकण्याचा क्षण येतो. त्यावेळी अस्तित्वासाठी कुणाचाही मुकाबला करू शकतो आणि कुठलेही आव्हान पेलण्याचे सामर्थ्य दाखवू शकतो असा संदेश देण्याची गरज भासते, असे त्यांनी म्हटले. आपल्या हिमालयीन सीमांवरील अनावश्यक आक्रमकतेवरून जग बदलत असल्याचे सूचित होते.
अस्तित्वात असणाऱ्या करारांचा भंग करून केवळ हिमालयीन विभागातच नव्हे; तर हिंद-प्रशांत विभागात शक्तिप्रदर्शनाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विभागाबरोबरच जगाचे भविष्य अनिश्चित होऊ शकत असल्याचे संकेतही मिळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजनाथ यांनी सीमेपलिकडील दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला. कुणाचेही समर्थन नसताना भारताने एकट्याने त्या आव्हानाचा मुकाबला केला. नंतर पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याची भारताची बाजू संपूर्ण जगाला पटली, असे ते म्हणाले.