इंदापूर – इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने (सोमवार ता.27 मार्च)रोजी शेकडो नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, ज्यांनी घरपट्टीवर व्याज लावले, ज्यांनी पाणीपट्टीवर व्याज लावले, ज्यांनी शास्ती बसवली. ज्यांनी गरिबाच्या घरकुलात अडचणी निर्माण केल्या, ज्यांनी गरिबाच्या घराच्या जागेवर कचरा डेपो केला, त्यांना शाप देण्यासाठी तृतीयपंथींचं शाप आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर नागरी संघर्ष समितीचे प्राध्यापक कृष्णाजी ताटे यांनी दिला आहे.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने जे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास शहरातील नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून संघर्ष समितीने केलेल्या मागण्या शासन स्तरावरून मान्य झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा इंदापूरकर व्यक्त करत आहेत. सन 2017 सालापासून इंदापूर नगरपालिकेने आकारलेले घरपट्टीवरील व्याज माफ करावे तसेच पाणीपट्टीवर आकारलेले बेकायदेशीर व्याज माफ करावे, बेकायदेशीर शासकीय दंड रद्द करून आकारलेली शास्ती संपूर्णपणे माफ करावी, कोरोना कालावधीतील घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी, नगरपालिकेच्या मालकीचे असणारे गाळे धारकांचे कोरोना कालावधीतील भाडे माफ करावे, अश्या तब्बल 27 मागण्या शहर नागरी संघर्ष समितीने केलेल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णाजी ताटे म्हणाले की, इंदापूर शहरातील नागरिकांना व्याज शासकीय दंड आकारला आहे, हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे, खऱ्या अर्थाने शहरातील नागरिकांना न्याय मिळावा, ही भूमिका संघर्ष समितीची आहे. यासाठी अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहोत. शहरातील नागरिक या महत्त्वाच्या प्रश्नामुळे व्याकुळ झाले आहेत तरी देखील नगरपालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप प्रा. कृष्णाजी ताटे यांनी केला.
जवळपास सात कोटी चे व्याज वसूल करायचे आहे. आजपर्यंत तीन कोटीचे व्याज नगरपालिकेने वसूल केले आहे. जवळपास दहा कोटी चे व्याजही नगरपालिका वसूल करते आहे. जवळपास 15 कोटी रक्कम येथील नागरिकांच्या डोक्यावर बसलेली आहे. धरणे आंदोलन करत असताना यामध्ये पोट आंदोलने करणार आहोत. यामध्ये तृतीयपंथीने या आंदोलनास पाठिंबा दिला असून, शाप आंदोलन यांच्या माध्यमातून केले जाईल, अशी ही माहिती प्रा कृष्णाजी ताटे यांनी दिली.
यावेळी भारत बोराटे, महादेव चव्हाण, नंदकुमार खरवडे, वसंत जाधव, सादिक भाई मोमीन, प्रशांत इंगोले, शिवराज बाबर, परमेश्वर काळे, इरफान शेख, प्रदीप पवार व आंदोलनकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनास पाठिंबा –
इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात शहर नागरी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातूनच शहरातील गरीब कुटुंबांना न्याय मिळणार आहे. गोरगरीब शहरातील नागरिकांवर व्याज, शासकीय दंड, नगरपालिका च्या माध्यमातून लादलेले आहे. त्यामुळे संघर्ष समितीच्या खांद्याला खांदा लावून या सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती पक्ष अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली. तसेच पाठिंबा पत्र संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आले.