लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारने दिलेला बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे.
गेल्या शुक्रवारीच लोकसभा सचिवालयाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द केले. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते.
राहुल गांधींची खासदारकी का रद्द केली?
2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते. ‘सगळ्याच चोरांचे आडनाव मोदी कसे असू शकते?’ असे कथित वक्तव्य त्यांनी केले होते.
त्यानंतर भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी हे वक्तव्य केले होते.
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा प्रस्तावित आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि लगेच जामीनही मिळाला आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले होते.
महात्मा गांधींचा एक सुविचार त्यांनी या ट्विट मध्ये मांडला, “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहेत. सत्य माझा देव आहे. अहिंसा ते मिळवण्याचं साधन” असे ते म्हणाले होते.