चेन्नई – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात 31 वर्षांनंतर तुरूंगातून सुटका झालेल्या नलिनी श्रीहरनने आज काही माध्यमांशी बोलताना त्यावेळेच्या घटना सांगितल्या. राजीवजींची कन्या आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यावेळी नलिनीची तुरूंगात भेट घेतली होती. तेव्हा प्रियंका यांना राजीव गांधी यांच्याबाबत विचारण्यात आल्यावर त्या ढसाढसा रडल्या होत्या अशी आठवण तिने सांगितली.
सगळ्यात प्रदीर्घ काळ तुरूंगवासात राहीलेली महिला म्हणून यापुढे कायम नलिनीचेच आता नाव घेतले जाईल. आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तीने अन्य काही बाबींचाही खुलासा केला. ती म्हणाली की सोमवारी ती त्रिची येथील स्पेशल कॅंपमध्ये तिच्या पतीला भेटायला जाणार आहे. त्यांचे लग्न झाले असून त्यांची मुलगी विदेशात राहते. माझी मुलगीही तिच्या पित्याला भेटण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.
मलाही स्वत:ला तमिळनाडूतील अनेक ठिकाणांना भेट द्यायची आहे. विशेषत: स्व. कमला सर मेमोरियल पहायचे आहे. मला माझ्या पतीला भेटता येत नसल्यामुळे मला फारसा आनंद होत नाहीये. माझी तमिळनाडू सरकारला विनंती आहे की त्यांनी माझ्या पतीची सुटका करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करावी.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट घेऊन त्यांनाही आपण धन्यवाद म्हणणार असल्याचे तिने सांगितले. यावेळी तिने राजीव गांधी यांच्या कुटुंबाचेही आभार मानले व संधी मिळाली तर त्यांचीही भेट घेणार असल्याचे नमूद केले.तुरूंगात कशी वाईट वागणूक दिली जाते याची माहितीही नलिनीने दिले.
दोन महिन्यांची गर्भवती असतानाच आपली तुरूंगात रवानगी करण्यात आली होती असे ती म्हणाली. भविष्यातील योजनेबाबत ती म्हणाली की माझे आयुष्य अगोदरच उध्वस्त झाले आहे. आता मी काही करणार नाही. केवळ कुटुंब हीच माझी प्राथमिकता असेल.