हैदराबाद – दिल्लीतील सेवांवरील नियंत्रणाविषयीचा अध्यादेश मागे घेण्यात यावा. अन्यथा, संसदेत तो नामंजूर होईल, अशा शब्दांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मोदी सरकारला इशारा दिला. मोदी सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजकीय लढा सुरू केला आहे.
तो अध्यादेश विधेयकाच्या रूपात राज्यसभेत सादर झाल्यानंतर फेटाळला जावा यासाठी केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या समवेत केसीआर यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केसीआर यांनी केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
मोदी सरकारने स्वत:हून अध्यादेश मागे घ्यावा. तसे न झाल्यास अध्यादेश संसदेत मंजूर होणार नाही यासाठी आम्ही सर्व शक्ती पणाला लावू, असे त्यांनी म्हटले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीविरोधात मोदी आणि इतर भाजप नेते बोलतात. मात्र, मोदी सरकारने उचललेले अध्यादेशाचे पाऊल त्या आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देणारे आहे. तेव्हाच्या आणि आताच्या केंद्र सरकारांमध्ये फरक तरी काय उरला, असा सवालही केसीआर यांनी केला.