नवी दिल्ली – भाजपला पर्याय म्हणून विरोधकांची मोट बांधून इंडिया आघाडी उभी करण्यात आली आहे. तथापि, या आघाडीत काही असंतुष्टाचाही भरणा आहे. कॉंग्रेसने कितीही व्यापक दृष्टीकोन आणि मोठे मन केले तरी असंतुष्टांमुळे खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही आघाडी स्थापन करण्यासाठी सुरूवातीच्या टप्प्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच संदर्भात उलट सुलट बातम्या येत असतात. आघाडीतील २६ पक्षांचा नेता कोण यापाशी सगळे काही थांबलेले दिसते. नेत्याबाबत निवडणुकीनंतर ठरवू असे जाहीरपणे लाख सांगितले जाते. मात्र अंतर्गत कुरबुरी तोपर्यंत संपणार नाहीत जोपर्यंत नेत्याची निवड होत नाही.
मध्यंतरी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील जुगलबंदी माध्यमांमध्ये रंगलेली पाहायला मिळाली तर तृणमूल कॉंग्रेसचा वेगळाच राग बंगालमधून ऐकायला येत असतो. ममता बॅनर्जी यांना नेता अर्थात पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले जावे ही तृणमूलची इच्छा लपून राहीलेली नाही तर संयुक्त जनता दल मुळात पंतप्रधान पदासाठीच आघाडी स्थापन करण्यासाठी सरसावला होता.
जर ते पदच नितीश यांना हुलकावणी देणार असेल तर नितीश यांना आणि त्यांच्या पक्षालाही आघाडीत फारसे स्वारस्य असण्याचे काही कारण नाही. गेल्या काही दिवसांत संयुक्त जनता दलात बराच कोलाहल माजला आहे. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पायउतार झाले असून पुन्हा नितीश यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
नितीश यांची भाजपच्या संदर्भात चाचपणीही सुरू असून त्यांनी पुन्हा एनडीएत जाण्याची सशर्त तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे. या सगळ्याच्या पाश्र्वभूमीवर आता नितीश यांना इंडिया आघाडीचे निमंत्रक पद सोपवून शांत करण्याचा विचार कॉंग्रेसकडून सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.