नवी दिल्ली – नाट्यमय घडामोडी अनुभवत असलेल्या राजकारणाच्या दृष्टीने 1 ऑगस्ट या दिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेमकं काय करणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पवार पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार की राज्यसभेतील संभाव्य मतदानात सहभागी होणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पवार यांच्यावरून सध्या तरी विरोधी गोटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याशिवाय, विरोधकांच्या आघाडीची (इंडिया) बैठकही लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातील कार्यक्रमात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 1 ऑगस्टला होणाऱ्या त्या कार्यक्रमाला पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याच दिवशी राज्यसभेत मोदी सरकार विरूद्ध इंडिया असा मुकाबला रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण म्हणजे दिल्ली अध्यादेशावर त्या सभागृहात होणारे संभाव्य मतदान. पवार यांनी मोदींसमवेत एका व्यासपीठावर उपस्थित राहणे टाळावे अशी एकवटलेल्या विरोधकांची आधीपासूनच इच्छा असल्याचे समजते. अशात राज्यसभेतील मतदानाचा विषय पुढे आला आहे.
ते मतदान पुण्यातील कार्यक्रमाच्या दिवशीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पवार यांनी मतदानात सहभागी व्हावे, अशी विरोधकांची अपेक्षा असल्याचे समजते. राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ जवळपास सारखेच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा एका मतालाही मोठे महत्व प्राप्त होणार आहे.
इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्या बैठकीसाठी 25 आणि 26 ऑगस्ट या तारखा जवळपास निश्चित झाल्या होत्या. मात्र, काही नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे ती बैठक लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत. आता ती बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. ऑगस्टच्या मध्यापासून पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यामुळे तेही बैठकीसाठी आधी ठरलेल्या तारखांना उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती पुढे आली.