मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राज्यासह देशातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी भाष्य केले. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा’, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. “राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे”, असे ते म्हणाले होते.
मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे, असं म्हणत त्यांनी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.