मुंबई – नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, या बातम्या खोट्या आहेत. ईडी माझ्या घरी आली तर त्यांचे मी स्वागतच करेल. आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत आहे, असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.
ईडीच्या छापेमारीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. नवाब मलिक म्हणाले, पहिल्यांदाच इतिहासात वक्फ बोर्डावर एका पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केली आहे. बोर्डाने आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेतली आहे. तसेच अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. जेव्हापासून हे खाते माझ्याकडे आले तेव्हापासून क्लिनअप अभियान सुरू झाले आहे.
वक्फ बोर्डाचे काम संपूर्ण पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. आगामी काळात वक्फ कार्यालयाची सर्व काम डिजीटल करण्यात येणार आहे. जुने कागदपत्र, सर्व फाईल्स स्कॅन करून सुरक्षित करण्याचे काम आम्ही केले. तसेच पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यलयावर छापे पडलेले नाही. ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
ड्रग्जचा खेळ गुजरातमधून
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली.