नवी दिल्ली – कोठे पोहोचला आहात? परिस्थिती काय आहे? तेथे काही समस्या आहे का? दोन वाजता तुम्हाला पुढची माहिती देतो, हे संदेश आहेत जैश ए महंमदच्या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मोबाईलवरचे. नागरोटा येथे या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता.
त्यांच्याकडे असणारा मोबाईल रेडिओ मॅक्रो इलेक्ट्रॉनिक्स या पाकिस्तानी कंपनीचा होता. हे दहशतवादी त्यांच्या पाकिस्तानी हॅंडलरसोबत पाकिस्तानी कंपनी क्यू मोबाईल कंपनीच्या हॅंडसेटवरून सातत्याने संपर्कात होते. त्यांच्याकडे पाकिस्तानी बनावटीची औषधे, एवढेच नव्हे तर ते वापरत असलेले बूटही पाकिस्तानी कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले.
या सर्व प्रकरणाचा तपास जम्मू काश्मिर पोलिस करत आहेत. जिल्हा विकास परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका उधळून लावण्यासाठी त्यांच्यावर विशिष्ठ हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. त्यांच्याकडे 11 एक रायफली, 24 मॅगेझिन्स आणि साडेसात किलो आरडीएक्स , 20 मिटर आयईडी वायर आणि सहा डिटोनेटर पोलिसांनी ताब्यात घेतले. एक अंडर बॅरेल ग्रेनेड लॉंचर, 26 ग्रेनेड, पाच रायफल ग्रेनेड, तीन पिस्तूल आणि सहा मॅगेझिन्स, वायरलेस सेट तसेच एक जीपीएसही सापडला आहे.
या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या औषधअंमध्ये वेदनाशामक, अतीसार रोखणारी अँटीबायोटिक, युनानी औषधे, इंजेक्शन आणि शस्त्रक्रियेचे गॉज सापडले. हे सारे पाकिस्तानी कंपन्यांनी बनवलेले आहेत. लाहोर मेडिकल इन्स्ट्रूमेंट प्रा. लि. (कसूर), क्वारेशी इंडस्ट्रीज (खायबर) सामी फर्मास्युटिकल्स (कराची), रेहमान रेनबो प्रा. लि. (लाहोर) आणि सनोफी अव्हेंटिस पाकिस्तान लि. (कराची) या कंपन्यांची ही उत्पादने आहेत.
या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या तपासात हाती आलेल्या महितीनुसार या दहशतवाद्यांनी जम्मूमधून भारतात प्रवेश केला. पुर्वनियोजित ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर सांबाजवळ त्यांनी ट्रकमध्ये प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या ट्रकमधून त्यांना काश्मिर गाठायचे होते. मात्र बन टोल नाक्याजवळ गुप्तचरांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीमुळे त्यांना अडवण्यात आले. पोलिसांनी ट्रक तपासण्याचा प्रयत्न जेंव्हा केला त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर झालेल्या चकमकीत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था ही प्रक्रिया उधळण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या हाती लागली आहे. या निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी आहे. जनतेतून त्याला प्रतिसादही मिळत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया पाकिस्तानला उधळून लावायची आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
राजकीय नेते सॉप्ट टार्गेट –
ऑगस्ट 2019 पासून सुमारे 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यात 30 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. ही बहुतांश कारवाई गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारीत होती. काश्मिरमध्ये ऑगस्ट 2019मध्ये घटनात्मक बदलानंतर तेथे अराजकता माजवण्याचे अनेक प्रयत्न पाकिस्तानने केले आहेत.
त्यात यश न आल्याने पाकिस्तानने राजकीय नेते आणि नागरिकांना लक्ष्य बनवण्याचे सोपे टार्गेट निवडले आहे. मात्र त्यांचे हेही प्रकार जम्मू काश्मिरमधील जनतेच्या सहकार्याने उधळण्यात आपल्याला यश येत असल्याचे गृहमंत्रालयातील या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या ाटीवर सांगितले.