अमरावती – राज्यात सध्या भोंग्याचा मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याला भाजपनेही उघडपणे पाठिंबा दिला असून अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे रवी राणा यांना मोठा झटका बसला असल्याचे मानले जात आहे.
गेल्या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आले होते. सर्वधर्मीय पार्टी म्हणून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ओळख होती. मात्र राणा दाम्पत्य यांनी भाजपला समर्थन दिले. हिंदुत्ववादी विचाराचा पुरस्कार करीत असल्याने आम्ही सामुहिक राजीनामे देत असल्याची माहिती अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अयुब खान यांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्यासाठी तारीख जाहीर केली आहे. ते 23 एप्रिलला मातोश्रीवर जाणार असल्याचा इशाराही राणा यांनी दिला आहे.