मुंबई – सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने राजकारण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर या वादाला सुरुवात झाली. यावरूनच आता आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे अशी जहरी टीका राणा यांनी यावेळी केली आहे.
वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे समर्थन करतात असं म्हणत राणा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. आपल्या अधिकृत ट्विटररून एक व्हिडीओ पब्लिश करत राणांनी यावेळी ठाकरेंवर निशाणा साधला. आपल्या व्हिडिओमध्ये राणा म्हणतात,“स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचं शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे असा घणाघात राणा यांनी यावेळी केला.
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) November 17, 2022
रवी राणा पुढे म्हणतात,आक्षेपार्ह विधान करणारे राहुल गांधी आणि त्याच समर्थन करणारे उद्धव ठाकरे या दोघांवर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. तसेच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी राणा यांनी यावेळी केली. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रवी राणा यांनी यावेळी दिला आहे.