मुंबई – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आणखी काही नेते कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसे खरोखरीच घडल्यास ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कॉंग्रेसला गळती लागण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फाटाफुटीमुळे राज्यात सातत्याने राजकीय उलथापालथी सुरू आहेत. त्या विरोधकांची ताकद घटवणाऱ्या ठरल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर कॉंग्रेस राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला. कॉंग्रेसजनांकडून पक्षातील एकजुटीला तडा जाणार नाही, असे चित्र रंगवले जात होते. मात्र, त्या पक्षातूनही आऊटगोईंगचे सत्र सुरू झाले आहे.
महिनाभराच्या कालावधीत कॉंग्रेसमधून तीन नेते बाहेर पडले आहेत. सर्वांत आधी मागील महिन्यात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मुंबईतील आणखी एक नेते बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेसशी फारकत घेतली. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे भाग बनले. आता चव्हाण यांच्या रूपाने कॉंग्रेसला आणखी मोठा हादरा बसला आहे. चव्हाण यांचे अनुकरण आणखी काही नेते करतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत.