मुंबई – नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला असून तो आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी व्यक्त करत थेट विधीमंडळ पक्षनेते पद सोडण्याचा निर्णयही कळवला आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे आता या कलहावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हाय कमांडकडे पाठवल्यानंतर ते या राजीनाम्यावर ठाम आहेत. तर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातील काही नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती आहे.
थोरात यांची समजूत काढण्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांच्यावरती अन्याय कसा झाला आणि नाना पटोले कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे काही नेते करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात कॉंग्रेसची एक फळी निर्माण होताना पाहायला मिळते.
पटोले यांच्याबद्दल स्वपक्षातील कॉंग्रेसचे नेत्यांची नाराजी तर आहेच, मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचीही नाराजी पाहायला मिळते. राष्ट्रवादी कॉंग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे अनेकदा नाराजी व्यक्त केलेली होती. या सर्व घडामोडी घडत असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. प्रत्येक जण दिल्लीतील आपल्या जवळच्या नेत्याशी संपर्क करुन आपला रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण गटाची लागणार वर्णी?
नाना पटोले आणि थोरात प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत जाऊन ठाण मांडले आहे. थोरात यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा मंजूर झाल्यास अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर कॉंग्रेसच्या आतापर्यंतच्या प्रथेनुसार प्रदेशाध्यक्षही बदलले जाऊ शकतात.
पटोलेंचे मायनस पॉइंट काय?
-ते भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आले
-जुन्या कॉंग्रेसजनांना आपल्यातले वाटत नाहीत
-त्यांच्याबाबत एकप्रकारची लादलेपणाची भावना
-आक्रमकपणाच्या भरात चुकीच्या वेळी चुकीची वक्तव्ये
-सबुरीने घेण्याच्या कॉंग्रेसच्या वैशिष्ट्याला मारक ठरणारा स्वभाव
-मुळात पटोलेंच्या मंत्रिपदाच्या अपेक्षांमुळेच राज्यातील सत्तांतर घडल्याची भावना
-त्यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले नसते तर राज्यातील चित्र कदाचित आज वेगळे असते
-शिवसेनेतील बंड एवढे विकोपाला गेले नसते व आघाडी सरकारही तगले असते