भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची सरशी होणार असे भाकित वर्तवले जात असताना कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या ज्येष्ठतेकडे आणि गांधी घराण्याशी असलेल्या जवळकीकडे दुर्लक्ष करत त्यांची उचलबांगडी केली जाणार असे म्हटले जात होते. त्यानुसार कमलनाथ यांची उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी जीतू पटवारी यांच्याकडे मध्य प्रदेश कॉंग्रेसची धुरा सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत स्वत: पटवारी यांचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून ३५ हजार मतांनी पराभव झाला आहे. असे असतानाही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे हा प्रकार काहीसा अचंबित करणारा ठरला आहे.
मात्र जाणकारांच्या मते पटवारी यांची निवड ही कॉंग्रेसची चांगली खेळी असून कुठेतरी भाजपने मुख्यमंत्रिपदाची निवड ज्या निकषाच्या आधारे केली त्या अनुशंगाने विचार करत करण्यात आली आहे. मोहन यादव यांना भाजपने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री केले आहे. यादव हे ओबीसी वर्गातून येतात आणि मध्य प्रदेशच्या मालवा निमाड भागातून येतात.
पटवारी हेही याच भागातील कॉंग्रेसचे नेते आहेत. या भागात विधानसभेच्या ६६ जागा आहेत आणि राज्याच्या राजकारणात हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याचे मानले जाते. त्यामुळे यादव यांना लढा देण्यासाठी त्यांच्या वर्गातला आणि त्यांच्याच भागातला नेता म्हणून पटवारी यांच्याकडे कॉंग्रेसने जबाबदारी सोपवली आहे.
इंदोरजवळच्या बिजलपूर या छोट्या शहरात स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबात जन्मेलेले पटवारी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. कॉंग्रेस पक्षातूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली असून हळूहळू त्यांनी पक्षात स्वत:चे स्थान निर्माण केले. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा राऊ येथून विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर २०१८ मध्येही त्यांनी आपली जागा कायम राखली होती. मध्य प्रदेशात युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे.