पुणे – सुरूवातीला लॉकडाऊन, कच्च्या मालाचा तुटवडा, त्यानंतर पावसाळा आणि आता घटती मागणी अशा अनेक अडथळ्यांना सध्या कारागिरांना तोंड द्यावे लागत आहे. करोनामुळे देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले आणि जगभरातील उद्योग विश्व ठप्प झाले. दिवाळीमध्ये दिव्यांनी घरे उजळवणाऱ्या कारागिरांना देखील याचा फटका बसला.
लॉकडाऊनमुळे वेळेवर कच्चा माल न पोहोचणे आणि आता घटलेल्या मागणीचा फटका कारागिरांना बसला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा उलाढाल होणार की नाही, असा प्रश्न कारागिरांसमोर उभा ठाकला आहे. याचा डिजिटल प्रभातने घेतलेला विशेष आढावा.
मातीच्या गोळ्यातून घडणाऱ्या सुबक पणत्या, विविध प्रकारचे दिवे दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी लागतात. तर लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मीच्या मूर्ती देखील घरांत आणल्या जातात. याचबरोबर लहानग्यांनी केलेल्या किल्ल्यांवर मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर हवीच असते. आपली दिवाळी अधिकच आकर्षक करणाऱ्या कारागिरांना व्यवसायात फटका बसला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा विक्रीत सुमारे 40 टक्के घट झाली आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर कारागिर मूर्ती काम करतात. गणपती, गौरींचे मुखवटे, पणत्या, विविध प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी पिढ्यानपिढ्या चालते. दरवर्षी या ठिकाणी होलसेलर्ससह घरगुती उत्सवासाठी खरेदी करणाऱ्यांची गर्दी होत असते. मात्र यंदा हा प्रतिसाद खूप कमी असल्याचे कारागीरसांगतात.